Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २३

पाण्याची आवश्यकता कोणास नाही ? म्हणूनच त्यास जीवन म्हणतात. मनुष्य, पशू, पक्षी सर्वांना त्याची आवश्यकता आहे. मात्र तहान लागेल तेव्हाच मनुष्य पाणी पिईल, किंवा पाण्याजवळ जाईल व मोजके पाणी घेईल. पण त्यास पाण्यातच राहा म्हटले तर राहणार नाही. ते त्याच्या सामर्थ्याच्या बाहेरचे आहे. बेडकुळी, साप इत्यादि प्राणी पाण्यातही राहतात व बाहेरही राहू शकतात. मासोळी मात्र फक्त पाण्यातच राहील, बाहेर राहू शकत नाही हे प्रसिद्ध आहे. संसारात बरेच लोक असे आहेत की ज्यास देव पाहिजे, पण दुःखाचे वेळी. ते दुःख नाहीसे करणाऱ्याचे साधन म्हणून देव पाहिजे. तेवढे दुःख नष्ट झाले म्हणजे देवाचा संबंध तुटला. सकाम व्रते करणारे इत्यादी. कित्येक सुखात असूनही देवास विसरत नाहीत. संसारात राहतात व नित्यपूजा, जप, ध्यान इत्यादि साधनेही करताना. देवास संपूर्णतया विसरत नाहीत. तर कित्येक दुर्लभ असे भक्त सुखदुःख, लाभहानि इत्यादिकांचा विचार न करता संसाराकडे पाठ फिरवून 'पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी | जागृती स्वप्नी पांडुरंग ||' अशा स्थितीत नित्य देवाचेच बनून सदा भक्तीतच रममाण होतात..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment